shetkari andolan : अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या या मुख्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेलं उपोषण अखेर आज (दुपारी ३.३० वाजता) संपलं. सरपंच मंगेश साबळे यांनी मंत्री अतुल सावे यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
शासनाच्या मदतीचं आश्वासन.. shetkari andolan
गेले आठ दिवस उपोषणाला बसलेल्या मंगेश साबळे यांची राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी आज उपोषणस्थळी भेट घेतली. सावे यांनी यावेळी स्पष्ट केलं की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. सध्या नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यांनी उपोषणकर्त्यांना दिलासा देत सांगितलं की, “येत्या आठ दिवसांत शासन शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करेल. तुमच्या सर्व मागण्या शासनाकडे त्वरित पाठवून आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो,” असं आश्वासन त्यांनी शासनाच्या वतीने दिलं. या आश्वासनावर विश्वास ठेवून मंगेश साबळे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास क्षीरसाठ, प्रदेश सचिव सुरेश पाटील बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिस मुलतानी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सैयद अनिस, तसेच उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधकांची टीका आणि पाठिंबा
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला. सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मंगेश साबळे यांची विचारपूस केली.
रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सरकारवर तीव्र टीका केली. “हा लढा केवळ तुमचा एकट्याचा नाही, तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा आहे. हे सरकार शेतकऱ्यांना फसवणारे आहे. निवडणुकीपूर्वी हेक्टरी २६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण सत्तेत आल्यावर केवळ १३ हजार रुपये दिले गेले. हे सरकार भूलथापा देणारं आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “शरद पवारांनी १२ ऑक्टोबरपर्यंत शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका,” असं आवाहनही त्यांनी साबळे यांना केलं.